प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत भाग घेण्यास दिनांक 31 जुलै 2024 पर्यंत मुदत वाढ सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

23

प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत भाग घेण्यास दिनांक 31 जुलै 2024 पर्यंत मुदत वाढ

सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

 

गडचिरोली,दि.16(जिमाका):राज्यात खरीप 2014 पासून प्रधानमंत्री पिक विमा योजना केंद्र शासनाच्या नियमानुसार राबविण्यात येते. खरीप 2024 मध्ये केंद्र सरकारच्या विमा पोर्टलवर (www.pmfby.gov.in) थेट ऑनलाइन स्वरूपात विमा अर्ज भरण्याची सुविधा 16 जून 2024 पासून सुरू केली होती व भाग घेण्याचा अंतिम दिनांक 15 जुलै 2024 होता.

दिनांक 15 जुलै 2024 रोजी सकाळी 10 पर्यंत या योजनेअंतर्गत 1 कोटी 36 लाख विमा अर्ज द्वारे साधारण 30 लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले होते. राज्यात सरासरी खरीप हंगाम पेरणी क्षेत्र 143 हेक्टर आहे . गतवर्षी म्हणजेच खरीप 2023 मध्ये पिक विमा अर्ज संख्या 1 कोटी 70 लाख होती व विमा संरक्षित क्षेत्र 1 कोटी 13 लाख हेक्टर होते.

राज्यात या योजनेत 95 टक्के पेक्षा जास्त विमा अर्ज हे सामूहिक सुविधा केंद्र (कॉमन सर्विस सेंटर) यांच्या माध्यमातून भरण्यात येतात. ग्रामीण भागामध्ये इंटरनेट सुविधा कमी असणे, त्याचा वेग असणे. त्याचबरोबर शासनाने नव्याने सुरू केलेली “लाडकी बहीण” या योजनेअंतर्गत अर्ज देखील सामूहिक सुविधा केंद्र (कॉमन सर्विस सेंटर) यांच्या माध्यमातून भरण्यात येतात.

अशाप्रकारे पिक विमा व लाडकी बहीण असे दोन्ही अर्ज कॉमन सर्विस सेंटर च्या माध्यमातून भरावयाच्या असल्याने, त्या यंत्रणेवर ताण आल्याने अनेक शेतकरी पिक विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहत असल्याची बाब निदर्शनास आली. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकासाठी विमा संरक्षण घ्यावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा योजना देऊ केली होती. मात्र वरील समस्यांमुळे जे शेतकरी पिक विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिलेले आहेत. त्यांना या योजनेत सहभाग घेता यावा, या हेतूने राज्य शासनाने दिनांक 31 जुलै 2024 पर्यंत मुदत वाढीचा प्रस्ताव केंद्र शासनास सादर केला आहे.

सदर प्रस्तावास केंद्र शासनाने अनुमती देऊन आता पिक विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2024 असा केला आहे. तरी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली, बसवराज मास्तोळी यांनी केले आहे .

0000