*बब्बुजी हकीम साहेबांचे जाणे मनाला चटका व वेदनादायी आहे*

8

*बब्बुजी हकीम साहेबांचे जाणे मनाला चटका व वेदनादायी आहे*

माझ्याही राजकीय जीवनात कलाटणी दिले

*मंत्री ना धर्मराव बाबा आत्राम यांचे शोकसंवेदना….*

 

अब्दुल रहीम अब्दुल हकीम उर्फ बब्बुजी हकीम यांच्या निधनाची बातमी कळताच मन सुन्न झाले आणि सोबतच मनाला चटका व वेदनाही झाले. माझ्या राजकीय जीवनात खरी व समर्थपणे साथ देऊन माझ्या राजकीय कलाटणीत त्यांचा खारीचा वाटा असून माझे जुने अभ्यासू, अनुभवी , जाणकार साथीदार कायमचे साथ सोडून गेल्याचे शल्य आहे असे शोकसंवेदना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त करून भावनेला वाट मोकळी करून दिले.

शोकसंवेदनात पुढे मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटले की, बब्बुजी हकीम हे सुद्धा खडतर प्रवास करून ‘शून्यातून विश्व’ निर्माण केले होते. वन वैभव शिक्षण मंडळाची स्थापना करून आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात व प्रामुख्याने अहेरी उपविभागात शिक्षणाचे जाळे पसरविले. आज असंख्य मुले-मुली शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत असून शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवीत आहेत. त्यामुळेच त्यांना प्रतिष्ठेचा व मानाचा आदिवासी सेवक पुरस्काराने महाराष्ट्र शासनाने सन्मानीत केले.

आदिवासी सेवक बब्बुजी हकीम यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते, त्यांना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा , सांस्कृतिक क्षेत्रात फार रुची व आवड होती. हॉकी, कबड्डी, खो-खो, फुटबॉल, व्हॉलीबॉल या खेळांमध्ये तरबेज व नैपुण्य होते. हकीम साहेबांची खेळ-कुदण्यामुळे कसलेले शरीर आणि त्यामुळे शरीरयष्टी व आरोग्य तंदुरुस्त होते. वयोमानानुसार त्यांची प्रकृती ढासळली होती. मागील अनेक वर्षांपासून ते अंथरुणावर (बेड रेस्ट)होते. त्यातच गत जानेवारी महिन्यातच त्यांची अर्धांगिनी चाचम्मा हकीम यांचे निधन झाल्याने व हक्काची खरी साथ सोडून गेल्याने त्यांना दुःख, चिंता व खिन्नपणा वाटत होते.

हकीम साहेब यांच्या तब्येतीची पाहणी करण्याकरिता अधून-मधून थेट त्यांच्या घरी तर कधी शासकीय कामानिमित्य तहसील कार्यालयात किंवा खमनचेरू मार्गाने माझे येणे-जाणे झाले की, माझ्या वाहन चालकाला निरोप दिले नसले तरी नित्यनेमाने गाडीला बब्बुजी हकीम यांच्या घरासमोर ‘ब्रेक’ लागायचेच. बब्बुजी हकीम यांचे तबीयत बघून व विचारणा करूनच माझा पुढचा प्रवास असायचे. माझ्या व्यक्तीक , सामाजिक, राजकीय क्षेत्रातील जीवनात व चढ उतारात सदैव त्यांची सक्षम साथ लाभली होती हे कदापि विसरण्यासारखे नाहीच. हकीम साहेबांचे जाणे हे मनाला वेदनादायी व चटका देणारे असून बब्बुजी हकीम यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि हकीम परिवाराला या दुःखातून सावरण्यासाठी अल्लाह बळ देओ हीच अल्लाह चरणी प्रार्थना असल्याचे म्हणत मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी शोक संवेदना व्यक्त केले.