दूरसंचारची अद्ययावत, सुसज्ज सेवा देण्यासाठी परिश्रम घ्या

75

दूरसंचारची अद्ययावत, सुसज्ज सेवा देण्यासाठी परिश्रम घ्या

खासदार अशोकजी नेते यांचे निर्देश

जिल्ह्यात टॉवर वाढविण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश

गडचिरोली येथे दूरसंचार सल्लागार समितीची आढावा बैठक

गडचिरोली :- दि. 5 मार्च

    गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम, नक्षल प्रभावित, जंगलव्याप्त व उद्योग विरहित जिल्हा आहे. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता  78 टक्के भाग हा जंगलाने व्याप्त असल्याने दुर्गम भागात संपर्क करणे अडचणीचे झाले आहे. त्यातच BSNL दूरसंचार विभागाची रेंज कमी रहात असल्याने नागरिकांना दोन-तीनदा फोन करूनही संपर्क होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन नवीन टॉवर ची निर्मिती करून ग्राहकांना अद्ययावत सुसज्ज सेवा देण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना वजा आवाहन खासदार अशोक नेते यांनी दिले.
भारत संचार निगम लिमिटेड च्या वतीने आयोजित जिल्हा दूरसंचार सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत विविध कामांचा आढावा घेतांना ते बोलत होते.
जिल्हा दूरसंचार सल्लागार समिती गडचिरोलीची  महत्वपूर्ण आढावा बैठक गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार मा अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 5 मार्च रोजी दूरसंचार विभागाच्या विश्रामगृहात पार पडली. बैठकीला दूरसंचार सल्लागार समितीचे सदस्य तथा भाजपचे जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे, समितीचे सदस्य सदानंद कुथे, सदस्य तथा जिल्हा उपाध्यक्ष डॉ भारत खटी, महिला आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य रेखाताई डोळस, जिल्हा दूरसंचार अधिकारी खंडेलवाल, बीएसएनएल चे अधिकारी किशोर कापगते, गोन्नाडे व दूरसंचार विभागाचे सर्व तालुक्याचे JTO, अधिकारी व  तंत्रज्ञ उपस्थित होते.

    यावेळी अधिकाऱ्यांना निर्देश देतांना  खासदार अशोक नेते म्हणाले, जिल्ह्याच्या अनेक भागात रेंज रहात नसल्याने जिल्ह्यातील टॉवर चे सर्वेक्षण करून आवश्यक त्याठिकाणी टॉवर मंजूर करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यास सांगितले तसेच सर्व ग्रामपंचायतींना डिजिटल करून त्यांना इंटरनेट सेवेने जोडण्याच्या सूचनाही यावेळी खासदार अशोक नेते यांनी केल्या. BSNL चे कव्हरेज रहात नसलेल्या ठिकाणी व दुर्गम तालुक्यात मायक्रो बीटीएस सुविधा लाऊन नागरिकांना योग्य सेवा देण्याचे  निर्देशही  यावेळी खासदार अशोक नेते यांनी दिले.

  तसेच जिल्ह्यात BSNL ची 4G सेवा सुरू करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करून  पाठपुरावा  करण्याचे निर्देश यावेळी खासदार अशोक नेते यांनी दूरसंचार अधिकाऱ्यांना दिले . तसेच इतर प्रायव्हेट कंपन्या अतिरिक्त रेंज ठेवत असल्याने रेडिएशन वाढत आहे त्यामुळे पशु-पक्षी यांना धोका होत असून मानवी जीवनातही काही दुष्परिणाम जाणवत आहे त्यामुळे त्याचावरही नियंत्रण आणण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याच्या सूचनाही यावेळी खासदार अशोक नेते यांनी दिल्या.

तसेच या आढावा बैठकीत इतर समितीच्या सदस्यांनी विविध विषय मांडले व त्यावर चर्चा करण्यात आली.